हिंगोलीत स्मार्ट मीटर विरोधात ११ ऑगस्टला धडक मोर्चा; ‘जुने मीटर परत द्या' ची मागणी
हिंगोली (Smart Meter Morcha) : राज्यभरात बसवले जाणारे स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी आर्थिक भुर्दंड ठरत आहेत असा आरोप करत, हिंगोली जिल्ह्यातील वीज ग्राहक संघटना आणि हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ यांनी एकत्र येत स्मार्ट मीटर विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट मीटरमुळे (Smart Meter Morcha) वीज बिलात अचानक वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वाढल्या आहेत. 'स्मार्ट मीटर म्हणजे स्मार्ट लूट आहे. ग्राहकांवर अन्याय करणारे हे मीटर आम्हाला मान्य नाहीत' अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे. त्यामुळे ज्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवले आहेत त्या ठिकाणी पुन्हा जुने मीटर लावून द्यावेत, यासाठी अर्ज व फॉर्म भरून घेण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. या मागणीसाठी सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी हिंगोलीत भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा (Smart Meter Morcha) मोर्चा सकाळी ११:३० वाजता महात्मा गांधी चौक येथून सुरू होऊन वीज वितरण कार्यालय पर्यंत जाईल. वीज ग्राहक संघटना हिंगोली आणि व्यापारी महासंघ यांच्या नेतृत्वाखाली होणार्या या मोर्चात हजारो नागरिक, व्यापारी आणि ग्राहक सहभागी होणार आहेत. 'नवे नको, जुनेच हवे', 'स्मार्ट मीटर बंद करा', 'ग्राहक एकता जिंदाबाद' अशा घोषणांनी परिसर दुमदुमणार आहे. आयोजकांचे म्हणणे आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेकांना कमी वापर असूनही जास्त बिल येत आहे. तसेच मीटरची रीडिंग, बिलिंग प्रक्रिया आणि तक्रार निवारण याबत पारदर्शकता नसल्याने सामान्य माणूस संभ्रमात आहे. तांत्रिक त्रुटी आणि अचानक वीज कपातीच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे तातडीने हा निर्णय मागे घेऊन जुन्या पद्धतीचे मीटर पुन्हा सुरू करावेत अशी ठाम मागणी केली जाणार आहे.
मोर्चापूर्वी ज्या नागरिकांना स्मार्ट मीटर काढून जुने मीटर हवे आहेत त्यांच्याकडून लेखी अर्ज आणि फॉर्म भरून घेतले जात आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. 'चला एकजुटीने आवाज उठवूया. आपले हक्क व आपली वीज वाचवूया' असे आवाहन करत आयोजकांनी जास्तीत जास्त नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. हा लढा केवळ हिंगोलीपुरता नसून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांच्या हितासाठी आहे, असे वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकार्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाच्या दृष्टीने बैठक संपन्न महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांची कोणतीही संमती न घेता त्यांच्या घरातील सुस्थितील व चालू असलेले जुने मीटर काढून त्या ऐवजी स्मार्ट मीटर सक्तीने बसविले जात आहेत. त्यामुळे महावितरणने स्मार्ट मीटर बसविणे तात्काळ थांबवावे, सौर उर्जेवर (सोलार) लावलेले अवाजवी आणि अनावश्यक कर तात्काळ रद्द करावा, या मागण्यांसाठी वीज ग्राहक आणि विविध राजकीय सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात ३० जुलै रोजी मुख्यमंत्री व उर्जामंत्र्यांच्या नावे हिंगोली महावितरण अधिक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या निमित्त श्री गणेश इन येथे २९ जुलैला बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली.