हिंगोलीतील ७४ वर्षांची परंपरा थांबली, जिल्हा परिषद कन्या प्रशाला बंद
सुधीर गोगटे हिंगोली (Zilla Parishad school closed) : इ.स. १९५२ मध्ये जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने सुरू झालेली आणि अनेक पिढ्यांना घडवणारी जिल्हा परिषद कन्या प्रशाला आता इतिहासजमा झाली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात मुलींच्या शिक्षणासाठी हिंगोली शहरात उभारलेली ही एकमेव स्वतंत्र माध्यमिक शाळा ७४ वर्षांचा प्रवास पूर्ण करून बंद करण्यात आली आहे.
या (Zilla Parishad school closed) शाळेची ओळखच मुळात तळागाळातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींसाठी आधारवड होती. प्रवेशासाठी केवळ मुलींनाच संधी असल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलींना सुरक्षित वातावरणात शिकण्यासाठी याच शाळेत पाठवले. एकेकाळी या प्रशालेत ६०० ते ७०० मुली शिक्षण घेत होत्या. शेतकरी, मजूर आणि छोट्या नोकरी करणाऱ्या कुटुंबातील मुली इथूनच दहावी उत्तीर्ण होऊन पुढे शिक्षिका, आरोग्य कर्मचारी, पोलीस, बँक अधिकारी आणि प्रशासकीय सेवेत गेल्या. अनेकांसाठी ही शाळा म्हणजे घरापासून हाकेच्या अंतरावर असले शिक्षणाचे एकमेव दार होते.
मात्र गेल्या काही वर्षांत विद्यार्थी संख्येत सातत्याने घट होत गेली. पटसंख्या कमी झाल्याने शासनाच्या धोरणानुसार ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कन्या प्रशालेतील शिक्षक आणि सध्या शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे समायोजन हिंगोलीतील बहुविध प्रशालेत करण्यात आले आहे. सहशिक्षण असलेल्या त्या शाळेत आता या मुलींना शिक्षण घ्यावे लागणार आहे.
शाळा बंद (Zilla Parishad school closed) झाल्याची बातमी कळताच माजी विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये व माजी शिक्षकांमधुन नाराजीचे सूर उमटले आहेत. मुलींसाठी स्वतंत्र शाळा नसल्याने काही मुलींचे शिक्षण मधातच थांबण्याची भीती पालकांनी व्यक्त केली. विशेषतः ज्या भागातून मुलींना लांब जावे लागते आणि सहशिक्षणाला कुटुंबाची परवानगी मिळत नाही, अशा मुली आता शिक्षण प्रवाहापासून दूर राहू शकतात अशी चिंता स्थानिकांनी बोलून दाखवली.
याबाबत शिक्षण विभागाचे म्हणणे आहे की, पटसंख्या आणि संसाधनांचा योग्य वापर व्हावा यासाठी समायोजनाचा निर्णय घेण्यात आला. बहुविध प्रशालेत सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि तिथे मुलींच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
१९५२ पासून आजवर हजारो मुलींचे भविष्य घडवणाऱ्या या वास्तूचे दरवाजे आता बंद झाले आहेत. एका पिढीच्या आठवणी आणि दुसऱ्या पिढीच्या शक्यता यांच्यामधील दुवा असलेली कन्या प्रशाला बंद झाल्याने हिंगोलीतील मुलींच्या शिक्षणाचा एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. आता समायोजनानंतर या मुलींचे शैक्षणिक भवितव्य कसे आकार घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शिक्षण विभागाने उपाययोजना आखण्याची गरज
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा (Zilla Parishad school closed) वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना शिक्षण विभागाने करावी, अशी शिक्षणप्रेमींची मागणी आहे. माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत, त्यामुळे प्रशासन ढासळले आहे. विषय शिक्षकांची पदेही रिक्त आहेत. इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय शिकविण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या माध्यमिक शाळांमध्ये घटत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा बंद होत आहेत आणि विद्यार्थी खाजगी शाळांकडे वळत आहेत. भविष्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा वाचविण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी रिक्त पदे त्वरित भरणे गरजेचे आहे.