Hingoli Filth Area: हिंगोली शहरात कचऱ्याच्या ढीगाम

हिंगोली शहर घाणीच्या विळख्यात; जागोजागी कचऱ्याचे ढीग, नगर परिषद प्रशासन सुस्त

Hingoli Filth Area

हिंगोली (Hingoli Filth Area) : शहर सध्या स्वच्छतेच्या गंभीर समस्येला तोंड देत आहे. शहरातील गल्लीबोळापासून मुख्य रस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून नगरपालिका स्वच्छता विभागाची यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली आहे. पावसाळा नुकताच सुरू होत असताना या साचलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे आणि नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

शहरातील अनेक प्रभागांमध्ये आठवडोन्‌आठवडे कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः बाजारपेठ, बसस्थानक परिसर, शाळा-महाविद्यालयांजवळील भाग आणि दाट वस्त्यांमध्ये परिस्थिती अधिकच भयावह आहे. काही ठिकाणी तर कचऱ्याचे ढीग इतके मोठे झाले आहेत की त्याठिकाणी डुकरांसह मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. ही जनावरे कचरा पसरवत असून अपघातांनाही निमंत्रण देत आहेत. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांसाठी हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मध्यंतरी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतः शहरातील विविध भागांची पाहणी केली होती. त्यावेळी (Hingoli Filth Area) हिंगोली शहरातील घाणीचे साम्राज्य पाहून त्यांनी नगरपालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. त्यांच्या आदेशानंतर तात्पुरती मलमपट्टी म्हणून जेसीबीच्या माध्यमातून कचरा जमा करून टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकण्यात आला. मात्र, ही कारवाई केवळ प्रसिद्धीसाठीच होती, हे काही दिवसांतच स्पष्ट झाले. कारवाईनंतर काही दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आणि कचऱ्याचे ढीग पुन्हा त्याच ठिकाणी जमा होऊ लागले.

सध्या म्हणावा तसा जोरदार पाऊस सुरू झालेला नाही, परंतु हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांवर साचलेल्या या कचऱ्यामुळे नाले-गटारे तुंबण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, सखल भागात पाणी साचून साथीचे आजार पसरण्याचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, टायफॉईड, कावीळ यांसारखे जलजन्य आणि कीटकजन्य आजार फैलावण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाच्या पाण्यासोबत हा कचरा वाहून गेल्यास पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित होऊ शकतात.

हिंगोली नगरपालिकेकडे मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची कमतरता असल्याचे कारण नेहमीच पुढे केले जाते. मात्र, नागरिकांचा प्रश्न आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालूनही जर परिस्थिती बदलत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींना कोण विचारणार? स्वच्छता कर्मचाऱ्यांची अनियमितता, कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे नियोजन नसणे आणि डम्पिंग ग्राउंडच्या व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

शहरातील सुज्ञ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार निवेदने देऊन, तक्रारी करूनही प्रशासन ढिम्मच असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे हिंगोलीकरांचे आरोग्य वाऱ्यावर सोडले गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुन्हा एकदा यात जातीने लक्ष घालून नगरपालिका प्रशासनाला कडक शब्दांत सूचना द्याव्यात आणि स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबवावी, अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, येत्या काळात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न स्फोटक रूप धारण करू शकतो, असा इशारा नागरिक देत आहेत.