तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी बदली केलेल्या चर्चेतील ३९ पोलिसांना फेर आदेशाचे लागले डोहाळे
हिंगोली (Superintendent of Police Transfer) : जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदल्या मध्यंतरी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी केल्या होत्या. विशेष म्हणजे अधिकार्यांच्या खास मर्जीतील ३९ पोलिसांची थेट पोलीस मुख्यालयात बदली केली होती. डॉक्टर निलाभ रोहन यांची बदली झाल्यानंतर आता बदल्या झालेल्या काही पोलिसांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे दर्शवुन त्यांना फेर आदेशाचे डोहाळे लागले आहेत. जिल्हा पोलीस दलातील २९ मे रोजी सर्वसाधारण बदल्या तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी केल्या होत्या. या बदलांमध्ये विशेष करून जिल्ह्यातील १३ पोलीस ठाणे व उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर अधिकार्यांच्या मर्जीतील ३९ पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या पोलीस मुख्यालयात करण्यात आल्या. त्यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली. त्यातील काही पोलिसांनी आपण कशातच नसल्याचा भाव दर्शवून आपल्यावर अन्याय झाल्याची ओरड केली. काढलेल्या आदेशानुसार ३९ पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयात हजरही झाले. त्यातच राज्याच्या गृह विभागाने मध्यंतरी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या केल्या.
ज्यामध्ये हिंगोली चे पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांची नांदेडला बदली करण्यात आली त्यांना हिंगोली येथून कार्यमुक्त करण्यात आले त्यांच्या जागेवर खामगाव बुलढाणा येथील अप्पर पोलीस अधीक्षक अर्पित लोढा यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली त्यांनीही जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच तत्कालीन पोलीस अधीक्षक नीलाभ यांनी बदली केलेल्या ३९ पोलिसांना यापूर्वी काढलेल्या आदेशावर नूतन पोलीस अधीक्षकांकडून फेर आदेशाचे अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे सदैव चर्चेत असलेल्या ३९ पोलिसांच्या यापूर्वी काढलेल्या आदेशावर नूतन पोलीस अधीक्षक काही निर्णय घेतात की पूर्वीच्या पोलीस अधीक्षकांनी केलेल्या बदलीनुसार त्या पोलिसांना पोलीस मुख्यालयालाच ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.