गडचिरोलीत रस्त्याअभावी खाटच रुग्णवाहिका! १४४ गावांतील रुग्ण व गर्भवतींची पावसाळ्यात जीवघेणी कसरत
एटापल्लीतील कोईंदूळ गावात गर्भवतीला दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवावे लागले; ४७ गावांना अद्याप रस्ताच नाही
गडचिरोली : राज्यात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. जिल्ह्यातील तब्बल १४४ गावांना पक्क्या रस्त्यांचा अभाव असल्याने पावसाळ्यात रुग्ण, गर्भवती महिला आणि नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे ४७ गावांमध्ये अद्याप कोणताही रस्ताच नसल्याने अनेक ठिकाणी खाट किंवा स्ट्रेचरच रुग्णवाहिकेचे काम करत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
याच पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यातील कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोईंदूळ गावातील पुष्पां सुनील परसा (वय ३०) या गर्भवती महिलेला पक्का रस्ता नसल्याने आणि वाटेत नाला असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुमारे दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून रुग्णालयात आणल्याची घटना घडली.
एकीकडे एटापल्ली तालुका सुरजागड लोहखनिज प्रकल्पामुळे देशभर चर्चेत असून या भागातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. दुसरीकडे याच तालुक्यातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असून गडचिरोलीला 'स्टील हब' बनविण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात गर्भवती महिला, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना रस्त्याअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विकासाच्या घोषणा आणि दुर्गम भागातील प्रत्यक्ष परिस्थिती यामधील तफावत स्पष्टपणे दिसून येत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. कोईंदूळसह रस्त्याविना असलेल्या १४४ गावांमध्ये तातडीने पक्के रस्ते उभारावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
एटापल्ली आणि भामरागडमध्ये गंभीर परिस्थिती
सुरजागड लोहखनिज प्रकल्प असलेल्या एटापल्ली तालुक्यातील ६५ गावे आठमाही रस्त्यावर अवलंबून आहेत. कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील कोईंदूळ, रेकनार, गडदापल्ली आणि गुंमडी ही गावे जंगलव्याप्त व आदिवासीबहुल भागात आहेत.
पावसाळ्यात या गावांतील नागरिकांना कसनसूर किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दोन मोठे आणि तीन लहान असे एकूण पाच नाले पार करावे लागतात. मुसळधार पावसात हे नाले दुथडी भरून वाहू लागल्याने गावांचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटतो. परिणामी रुग्णवाहिका पोहोचत नाही, विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित होते आणि नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
पावसाळ्यात संपर्क तुटणारी १४४ गावे
- एटापल्ली – ६५
- भामरागड – २४
- धानोरा – २२
- अहेरी – १३
- सिरोंचा – ११
- कोरची – ४
- मुलचेरा – २
- चामोर्शी – १
- कुरखेडा – २
या १४४ गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. अनेक ठिकाणी पक्के रस्ते नाहीत, तर अनेक नाल्यांवर पूलही उभारलेले नाहीत. त्यामुळे आदिवासी नागरिकांसमोर दैनंदिन जीवन जगण्याचे मोठे आव्हान उभे राहते.
अजिबात रस्ता नसलेली ४७ गावे
- भामरागड – २१
- धानोरा – १३
- कोरची – ४
- मुलचेरा – ४
- अहेरी – ३
- एटापल्ली – १
- कुरखेडा – १
अशा एकूण ४७ गावांमध्ये कोणताही रस्ता नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.