उत्कृष्ट नियोजनावर राजकीय सावळ्या-गोंधळाचे सावट
'समाधान शिबिर की कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन?' नागरिकांचा सवाल
रिसोड (Risod Samadhan Shibir) : कोणताही सामाजिक, राजकीय किंवा शैक्षणिक कार्यक्रम असो; कार्यक्रमाची शिस्त, स्वरूप आणि प्रोटोकॉल पाळणे हे त्याचे सौंदर्य असते. येथील विश्व लॉन येथे महसूल प्रशासनाच्या वतीने मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल सेवा समाधान शिबिरा'त मात्र भलताच प्रकार पाहायला मिळाला. या शिबिराला लोकप्रतिनिधी सह प्रशासकीय अधिकारी यांच्या सह रिसोड मालेगाव तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते प्रशासकीय उत्तम नियोजन असलेल्या या शिबिराला पदअधिकारी, कार्यकर्ते मुळे राजकीय शक्तीप्रदर्शनाचे स्वरूप आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून महसूल विभागतील अधिकारी व कर्मचारी या शिबिराच्या उत्कृष्ट नियोजनाच्या तयारीला लागले होते. तसे नियोजन पण उत्कृष्ट झाले होते, पण प्रत्यक्ष शिबिरादरम्यान मंचावर नेत्यांपेक्षा स्वयंघोषित कार्यकर्त्यांचीच मोठी भरमार पाहायला मिळाली. काही कार्यकर्ते पदाधिकारी फक्त प्रसिद्धीचा साठी कार्यक्रम पत्रिकेत नाव नसतानाही आणि आयोजकांनी व्यासपीठावर आमंत्रित न करता, केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी व्यासपीठावर मोठी गर्दी केली होती. ऐनवेळी अतिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था करताना आयोजकांची कार्यक्रमाची शिस्त बिघडते. स्थानिक पातळीवर राजकीय पदाधिकाऱ्यासोबत संबंध बिघडू नयेत म्हणून आयोजकही अशा कार्यकर्त्यांना उघडपणे उठवू शकले नाहीत, ज्याचा गैरफायदा हे पदाधिकारी घेताना दिसला.
त्यामुळे हे शासकीय शिबिर आहे की सर्वच पक्षाचे शक्तीप्रदर्शन? असा सवाल उपस्थितांमधून विचारला जात होता. व्यासपीठ हे भाषण करणाऱ्यांसाठी आणि निमंत्रित मुख्य पाहुण्यांसाठी असते. कार्यकर्त्यांची खरी जागा ही जनतेमध्ये असते. प्रत्येक पक्षाने आपल्या पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक कार्यक्रमांचे शिष्टाचार आणि आचारसंहिता समजावून सांगणे गरजेचे दिसत आहे. स्वाभिमान आणि शिस्त जपून स्वतःहून मंचावर न जाण्याचा पायंडा पाडला, तरच अशा शिबिरांचे आणि कार्यक्रमांचे गांभीर्य टिकून राहील.खाली श्रोत्यांमध्ये बसून शिबीर किंवा कार्यक्रम शांतपणे ऐकण्याऐवजी, मंचावर जाऊन बसल्याने नेतृत्व सिद्ध होत नाही. उलट, अशा आग्रही आणि अवाजवी वर्तनामुळे उपस्थित जनतेच्या मनात संबंधित कार्यकर्त्याबद्दलची आणि पक्षाबद्दलची प्रतिमा अपरिपक्व ठरते, असा सूर नागरिक आणि अभ्यास्क वर्ग व्यक्त करत आहेत.
केवळ फोटोत येण्यासाठी, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा समाजात आपले 'राजकीय वजन' दाखवण्यासाठी बिनबोलावलेले पदाधिकारी मंचावर जाऊन ठिय्या मांडून होते या प्रकारामुळे कार्यक्रमाचे गांभीर्य हरवले असून, हा विषय आता गंभीर आत्मचिंतनाचा बनला आहे. या समाधान शिबिरामध्ये लाभार्थ्याचे समाधान हो ना हो पण व्यासपीठावर बसलेले कार्यकर्त्यांचे मात्र राजकीय समाधान झाल्याचं चर्चा होत आहे