विरोधी पक्षाच्या आक्रमक भूमिकेला यश; चिखलीमध्ये आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत
काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांच्या दबावानंतर प्रशासनाच्या हालचाली
चिखली (Chikhli Water Crisis) : गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या चिखलीकरांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर यश आले असून प्रशासनाने तातडीने हालचाली करत आजपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला आहे.
शहरात १५ ते २० दिवसांनी होणारा पाणीपुरवठा, नागरिकांची वाढती गैरसोय आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपरिषद प्रशासनाला थेट इशारा दिला होता.
त्यानंतर काल झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने पाणीटंचाईच्या मुद्द्यावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत जाब विचारला. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. “चिखलीकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे,” असा आरोप करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल केला.
याच पार्श्वभूमीवर आज पहाटे डॉ. इसरार, डॉ. प्रकाश शिंगणे, डॉ. अमोल लहाने, श्री. गोकुळ शिंगणे, श्री. गोपाल देव्हडे, श्री. रत्नदीप शिनगारे, श्री. उबेद अली खान, श्री. आनंद बोन्द्रे, श्री. प्रशांत भटकर, श्री. संतोष देशमुख व श्री. पी. एस. वायाळ यांनी थेट चिखली नगरपरिषदेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रावर धडक देत प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी पाणी शुद्धीकरण केंद्रातील संपूर्ण यंत्रणा, जलसाठा, वितरण व्यवस्था तसेच शहरातील विविध भागातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना नियमित, सुरळीत व वेळेवर पाणीपुरवठा करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावामुळे प्रशासनाने अखेर कामाचा वेग वाढवत आवश्यक उपाययोजना केल्या असून आजपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. “चिखलीकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष सुरूच राहील. नागरिकांना वेठीस धरणारा कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही,” असा इशाराही यावेळी विरोधी पक्षाच्या वतीने देण्यात आला.