Chikhli Water Scarcity:

चिखली तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; २४ गावांमध्ये विहीर अधिग्रहण, ८ गावे टँकरवर अवलंबून

Chikhli Water Scarcity

चिखली (Chikhli Water Scarcity) : यंदा मान्सूनने अद्याप हजेरी न लावल्याने चिखली तालुक्यातील जलस्रोतांनी तळ गाठला असून अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जून महिन्याची २० तारीख उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने प्रशासनासमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने विहीर अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यातील २४ गावांसाठी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून संबंधित विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पळसखेड जयंती, दिवठाणा, वळती, करंवड, असोला नाईक, सोमठाणा, हातणी, आमखेड, मिसाळवाडी, साकेगाव, बोरगाव वसु, पेठ, बोरगाव काकडे, जांभोरा, करतवाडी, किन्ही सवडद, सोनेवाडी, उत्रादा, रानअंत्री, डोंगरशेवली, गांगलगाव, आंधई (चा), चांधई (आ) आणि धोत्रा नाईक या गावांमध्ये विहीर अधिग्रहणाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. दरम्यान, भालगाव, कोलारा, मंगरूळ प्र. खेडा, धानोरी आणि किन्ही नाईक या गावांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच आंधई (चा), चांधई (आ) आणि धोत्रा नाईक या गावांसाठी टँकर प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. एकूण ८ गावांची तहान टँकरवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी गटविकास अधिकारी समाधान वाघ तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करीत आहेत. याच दरम्यान हरणी येथे विहिरीवर पाणी भरण्यासाठी आलेल्या एका महिलेला पाणी काढताना अडचण येत असल्याचे पाहून वाघ यांनी कोणताही मोठेपणा न दाखवता स्वतः विहिरीतून पाणी शेंदून दिले. त्यांच्या या कृतीची ग्रामस्थांमध्ये मोठी चर्चा होत असून प्रशासनातील संवेदनशीलतेचे दर्शन घडल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी सांगितले की, पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. गरजेनुसार अतिरिक्त विहिरी अधिग्रहित करणे, टँकर मंजूर करणे आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

-२४ गावांमध्ये विहीर अधिग्रहणाचे आदेश -८ गावांसाठी टँकर व्यवस्था व प्रस्ताव प्रक्रिया -अनेक प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर -गटविकास अधिकारी समाधान वाघ यांची गावागावांत प्रत्यक्ष पाहणी -हरणी येथे महिलेला विहिरीतून पाणी काढून देत दाखवली माणुसकी -पाऊस लांबल्याने प्रशासनासमोर पाणीपुरवठ्याचे मोठे आव्हान

हरणी गावामध्ये शासनाची पाणीपुरवठा योजना  नसल्यामुळे  गावकरी ग्रामपंचायत जवळील जुन्या सार्वजनिक आठ ते दहा फूट रुंद असलेल्या विहिरीवर पाणी भरतात तसेच गावाशेजारील खाजगी लोकांच्या विहिरीतून गावकऱ्यांची ताण भागते. शासन स्तरावर असलेल्या शासकीय योजनेचा त्वरित पाठपुरावा होऊन काम मार्गी लागावे तेव्हाच  ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी मिळेल.