वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या एक

समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना; पत्नीची कारमध्ये हत्या करून तीन मुलांसह पतीने गाठले पोलीस ठाणे

चारित्र्यावर संशयातून घडली हत्या; कारंजा पोलीस ठाण्यात स्वतःहून जाऊन आरोपीची कबुली, तीन निरागस मुलांचे दृश्य हेलावून टाकणारे

वाशीम: वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चारित्र्यावर संशय घेत एका व्यक्तीने भरधाव कारमध्येच पत्नीची हत्या केल्याचा आरोप असून, त्यानंतर तीन लहान मुलांना सोबत घेऊन तो थेट कारंजा पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथे त्याने पोलिसांसमोर स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेदरम्यान आईच्या मृत्यूची कल्पनाही नसलेली तीनही चिमुकली मुले पोलीस ठाण्यात शांतपणे झोपल्याचे दृश्य उपस्थितांचे मन हेलावून टाकणारे ठरले.

या प्रकरणातील आरोपीचे नाव सलमान खान असून, तो उत्तर प्रदेशमधून आपल्या कारने महाराष्ट्रात आला होता. त्याच्यासोबत पत्नी हसीना बांनो आणि त्यांची तीन लहान मुले प्रवास करत होती. प्रवासादरम्यान पती-पत्नीमध्ये चारित्र्यावर संशय घेण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात सलमान खान याने पत्नीची गळा हत्या केली. ही संपूर्ण घटना त्यांची तीनही लहान मुले कारमध्ये उपस्थित असतानाच घडली.

घटनेनंतर आरोपीने काही किलोमीटरचा प्रवास करून कारंजा पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासोबत आलेल्या तीन चिमुकल्या मुलांना पाहून पोलिसांसमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला. आईचा मृत्यू झाला असून वडिलांना अटक होणार असल्याने ही तिन्ही मुले पालकांच्या आधारापासून वंचित झाली आहेत.

पोलीस ठाण्यात आल्यानंतर सलमान खान याने मुलांना तेथे अंथरलेल्या एका ब्लँकेटवर झोपवले. आईसोबत नेमके काय घडले आहे आणि आता आपल्यावरील पालकांचे छत्र हरपले आहे, याची या निरागस मुलांना कोणतीही जाणीव नव्हती. वडिलांसोबत शांतपणे पोलीस ठाण्यात आलेली ही तिन्ही मुले काही वेळातच ब्लँकेटवर झोपून गेली. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित पोलिसांसह अन्य व्यक्तीही भावूक झाल्या.