वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघातील न

उमेदवारी अर्ज मागे घेणे शैलेश अग्रवाल यांना महागात; काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई

Candidate Withdrawal Controversy

विधान परिषद निवडणुकीतील घडामोडीनंतर पक्षाचा कठोर निर्णय; सदस्यत्वही रद्द

वर्धा (Candidate Withdrawal Controversy) : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्याप्रकरणी काँग्रेसने माजी उमेदवार शैलेश अग्रवाल यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शिस्तभंगाची कारवाई करत अग्रवाल यांना पक्षातून निलंबित केले असून त्यांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

प्रदेश काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पक्षाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून शैलेश अग्रवाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र पक्ष नेतृत्वाला पूर्वकल्पना न देता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पक्षाची राजकीय अडचण वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पक्ष शिस्तीचे उल्लंघन आणि संघटनात्मक हिताला धक्का पोहोचविल्याचा ठपका ठेवत अग्रवाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

जिल्हा काँग्रेसची होती कठोर कारवाईची मागणी

या प्रकरणानंतर वर्धा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुनील कोल्हे यांनीही प्रदेश नेतृत्वाकडे अग्रवाल यांच्याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविलेल्या पत्रात पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप केला होता.

कोल्हे यांनी पत्रात नमूद केले की, महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अग्रवाल यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक पूर्ण ताकदीने कामाला लागले होते. प्रचारयंत्रणा उभी राहिली असताना अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि पक्षाची मोठी राजकीय हानी झाली.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

अग्रवाल यांनी अचानक माघार घेतल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर नाराजी दर्शवित पक्ष नेतृत्वाकडे तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रदेश नेतृत्वानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत अखेर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी काळात पक्षविरोधी किंवा पक्षशिस्त मोडणाऱ्या कृतींविरोधात काँग्रेस अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

पक्षांतर्गत चर्चांना उधाण

या कारवाईनंतर वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद निवडणुकीतील या घडामोडीमुळे पक्षांतर्गत समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.