Parbhani BHMS Doctor: सीसीएमपी पात्रता असलेल्या बी

परभणीत बीएचएमएस डॉक्टरांना सीसीएमपीनंतर नोंदणीस विरोध; आयएमए आक्रमक

Parbhani BHMS Doctor

संपामुळे परभणीत अपातकालीन सेवासह सर्व वैद्यकीय सेवा ठप्प

परभणी (Parbhani BHMS Doctor) : सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सील मध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ आयएमए महाराष्ट्रच्या वतीने संप पुकारण्यात आला. गुरुवार ६ ऑगस्ट पासून अपातकालीन सेवांसह सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. आयएमए परभणीच्या वतीने संपाला समर्थन देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा ठप्प झाल्या. बीएचएमएस डॉक्टरांना सीसीएमपी  कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ आयएमए महाराष्ट्रने २४ तासांच्या संपाचे आवाहन केले होते. या (Parbhani BHMS Doctor) आंदोलनाला आयएमए परभणी शाखेने पूर्ण पाठिंबा दर्शवित गुरुवार ६ ऑगस्टपासून खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी बुधवार ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून शासनाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध नोंदविला होता. बीएचएमएस आणि सीसीएमपीधारकांना आधुनिक वैद्यकीय उपचारांची नोंदणी देणे हे वैद्यकीय क्षेत्रातील गुणवत्ता, विश्वासार्हता आणि रुग्ण सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

शासनाकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने आंदोलनाची भूमिका घेण्यात आल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे. प्रस्तावित नोंदणी प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणीही करण्यात आली आहे. आयएमएच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.  निवेदनावर अध्यक्ष डॉ. के. बी. चौधरी, उपाध्यक्ष डॉ. कल्याण कदम, डॉ. निलेश पवार, डॉ. नितीन कदम, डॉ. राजू सुरवसे, डॉ. एकनाथ गबाळे, डॉ. खिल्लारे, डॉ. केदार खाटिंग, डॉ. करीम, डॉ. विद्या चौधरी, डॉ. जयश्री यादव, डॉ. मंजू भालेराव, डॉ. उज्वला झांबरे, डॉ. प्रवीण संगवे, डॉ. पी. व्ही. चेवले, डॉ. आर. एम. कालानी, डॉ. विजय बोंडे, डॉ. बिपीनचंद्र अवसरमल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांच्या स्वाक्षर्‍या आहेत. संपामुळे वैद्यकीय सेवा ठप्प आहेत. संप जास्त काळ चालला तर रुग्ण सेवेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता शासनाने तातडीने या संदर्भात तोडगा काढावा.

शासनाने तोडगा नाही काढला तर संप चालूच राहील आजचा संप हा लोकहीतासाठी आहे. आमचा संघर्ष शासनाशी नसून शासनाच्या धोरणाशी आहे. शासनाच्या धोरणावर आमचा तीव्र आक्षेप आहे. यावर शासनाने तोडगा नाही काढला तर संप चालूच राहील.  - डॉ.कालीदास चौधरी, आएमए अध्यक्ष

इमर्जन्सी सेवा बंद ठेवावी लागत आहे  गेल्या दोन वर्षापांसून आमचे आंदोलन चालू आहे. शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. शेवटचा उपाय म्हणून आम्हाला इमर्जन्सी सेवा बंद ठेवावी लागत आहे. डॉ.बोंडे

सामान्याच्या आरोग्याशी खेळ  शासनाचा बीएचएमएस झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ६ ते १२ महिन्याचा ब्रीज कोर्स करुन प्रॅक्टीसला परवानगी देण्याचे शासनाचे धोरण आहे. हा जनसामान्याच्या आरोग्याशी खेळ आहे.डॉ.राजु सुरवसे, परभणी