बाजार समिती जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आणणार-आ. अभिमन्यू पवारांचा संकल्प; औसा येथे शेतकरी भवनचे भूमिपूजन!
औसा (Ausa Farmer Bhavan Bhoomipujan) : औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन तसेच इतर सुविधा इमारतींच्या बांधकामाचे भूमिपूजन गुरुवारी पार पडले. तीन वर्षांपूर्वी केवळ ५ कोटी रुपयांच्या ठेवी असलेली औसा कृषी उत्पन्न बाजार समिती आज १७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताचे निर्णय यामुळे मराठवाड्यात अग्रगण्य बाजार समिती म्हणून औसा बाजार समितीची ओळख निर्माण झाली आहे. आगामी काळात ही बाजार समिती जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प यावेळी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सोडला.
या कार्यक्रमास माजी आमदार दिनकरराव माने, पंचायत समितीच्या सभापती गंगाबाई कोदळीकर, भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव, सभापती सोनवणे, बाजार समितीचे उपसभापती राचट्टे, मारुती महाराज कारखान्याचे संचालक रमेश वळके, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परिक्षीत पवार, सहाय्यक निबंधक रमेश सगर आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी बांधवांना बाजार समितीत सन्मानाने थांबता यावे, जेवण व विश्रांतीची सुविधा मिळावी यासाठी “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातून बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सोयाबीन, हरभरा यांसारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याचे प्रयत्न सुरू असून प्रक्रिया उद्योगांमुळे शेतीमालाला अधिक मूल्य मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सभापती सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार दिनकरराव माने यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास संचालक युवराज बिराजदार, प्रकाश काकडे, सौ. चंद्रकला झिरमिरे प्रवीण कोपरकर, संतोषी वीर, विकास नऱहरे, ईश्वर कुलकर्णी, राधाकृष्ण जाधव, गोविंद भोसले, धनराज जाधव,प्रवीण कोपरकर, शंकर पुंड,सुरेश औटी, संदिपान लंगर, मोहन कावळे मोहन, धुमाळ अजित, समितीचे सचिव संतोष हुच्चे, काकासाहेब मोरे, सुभाष मुक्ता, दिनकर मुंगळे, राजकिरण साठे, विष्णू साळुंखे, शिवलिंग औटी, गोविंदा दळवी, रवी चिलमे, वृषाल देशमुख, शिव मुरगे, विलास साळुंके संजय उजळंबे, आबा पवार आदींसह आडत व्यापारी, हमाल बांधव आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मारुती महाराज कारखान्याला १०९ कोटी मिळवून दिले!
पक्ष कोणताही असो; शेतकरी हिताच्या संस्था सक्षमपणे चालल्या पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे. संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना सहकार तत्वावर टिकून राहावा आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा यासाठी राज्य शासनाकडून या कारखान्यास १०९ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिल्याचे आ. पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
किल्लारी कारखान्याची ऊस बिले अदा
अनेक वर्षांपासून बंद असलेला श्री निळकंठेश्वर किल्लारी सहकारी साखर कारखाना पुन्हा सहकार तत्वावर सुरू करण्यात आल्याचे सांगून संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सर्व उसाची बिले अदा करण्यात आल्याचे आ. पवार म्हणाले.