आष्टीला अप्पर तालुक्याचा दर्जा देण्यास घोट परिसरातील नागरिकांचा तीव्र आक्षेप
घोट (Ashti Upper Taluka) : आष्टी गावाला अप्पर तालुक्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला घोट परिसरातील आदिवासी युवा संघटना, आदिवासी शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी (राजस्व), चामोर्शी यांना लेखी आक्षेप अर्ज सादर करण्यात आला. अर्जात नमूद केल्याप्रमाणे, घोट हे परिसरातील मध्यवर्ती गाव असून आजूबाजूच्या सुमारे २० आदिवासी गावांतील नागरिक बाजारपेठ, बँका, शासकीय कार्यालये, तलाठी कार्यालय, शाळा, महाविद्यालये, पोलीस ठाणे, टपाल कार्यालय तसेच इतर अत्यावश्यक सेवांसाठी घोट येथे येतात. त्यामुळे घोट हे या भागाचे प्रमुख सेवा केंद्र म्हणून विकसित झाले आहे. आष्टी येथे अप्पर तालुका घोषित झाल्यास घोट परिसरातील नागरिकांना शासकीय कामांसाठी सुमारे चामोशी येथे 40ते 50 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागेल.
त्यामुळे आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागेल, असा दावा अर्जात करण्यात आला आहे. घोटला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी यापूर्वी विविध आंदोलने व निवेदने देण्यात आल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे. शासनाने वस्तुस्थितीची पाहणी करून घोट गावालाच तालुक्याचा दर्जा द्यावा आणि आष्टीला अप्पर तालुका करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने (Ashti Upper Taluka) तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही घोट परिसरातील नागरिकांनी दिला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उपसरपंच सुगाबाई आत्राम माडेआमगावचे प्रशासक सरपंच अमोल पुगांटी,राकेश महां, विशाल पुगांटी,संतोष नरोटे,सुनील नरोटे,शामराव पुगांटी, सिताराम कुलेटी (पुसगुडा), जेलाबाई कुलेटी,चिन्ना कोवे, मिराजी नरोटे,प्रतिमा महा, महादेव टेकामी,विठ्ठल मोहरे, सवाई तिम्मा,भीमराज टेकामी (पोतेपल्ली),मनोहर टेकामी, विजय कुलेटी, सामजी तिम्मा,सुरेखा तिलामी,बालाजी गावडे (पोलीस पाटील, कोळसेगटा),रघुनाथ दुर्गा, भीमराज मोहरे,कुशाल कोवे, राहुल गव्हारे,कमलाबाई गावडे आदी उपस्थित होते.