अकोला महानगरपालिकेत शिवसेना गटांतील वाद तीव्रतेने वाढला
अकोला – महानगरपालिकेतील शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला असून, चार नगरसेवकांनी स्वतंत्रपणे गटनेत्याची निवड केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करत अमरावती विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चार नगरसेवकांनी २४ मार्च रोजी विशेष सभा घेऊन अधिकृत गटनेत्याला डावलत सागर सुभाषचंद्र भारुका यांची गटनेतेपदी निवड केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या सभेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, ही प्रक्रिया बेकायदेशीर आणि पक्षशिस्तीच्या विरोधात असल्याचा आरोप केला जात आहे.
महापालिकेत ‘मशाल’ चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांचा सहा जणांचा अधिकृत गट आधीच अस्तित्वात आहे. गटनेत्याची निवड पक्ष आदेशानुसार झालेली असताना समांतर सभा घेणे हे उघडपणे बेकायदेशीर असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ नुसार गटनेता बदलण्याचा अधिकार केवळ पक्षप्रमुख किंवा अधिकृत प्रतिनिधीला असतो. त्यामुळे पक्षादेशाशिवाय झालेली ही निवड अवैध ठरू शकते आणि संबंधित नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या चार नगरसेवकांनी नोटीसमध्ये ‘शिवसेना’ असा उल्लेख करत ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे अधिकृत नाव टाळल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा प्रकार कायदेशीरदृष्ट्या गंभीर मानला जात आहे.
आयुक्तांकडे हस्तक्षेपाची मागणी या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित सभा बेकायदेशीर घोषित करावी आणि अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतेही प्रशासकीय बदल करू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाद चिघळण्याची शक्यता अकोला महानगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटातील वाद अधिकच तीव्र होण्याची चिन्हे असून, प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.