धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: २.३२ कोटींच्या अनियमिततेप्रकरणी १५ कृषी अधिकारी निलंबित
चौकशीत १७ अधिकारी दोषी; कृषी मंत्री दत्ता भरणे यांची मोठी प्रशासकीय कारवाई, कृषी खात्यात खळबळ
धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत १५ कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनांच्या अंमलबजावणीत झालेल्या गंभीर अनियमिततेच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान भूमिहीन, मृत, दुबार तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांच्या नावावर कृषी निविष्ठांचे वितरण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. या संपूर्ण प्रकरणात २ कोटी ३२ लाख रुपयांच्या अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या चौकशीत एकूण १७ अधिकारी दोषी आढळले. त्यापैकी १५ कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये दोन जिल्हा कृषी अधीक्षक, आठ तालुका कृषी अधिकारी आणि चार मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.
या कथित घोटाळ्याची तक्रार आमदार कैलास पाटील यांनी केली होती. तसेच शेतकरी आंदोलक अमोल जाधव यांनीही या प्रकरणी आंदोलन छेडले होते. दरम्यान, निलंबनानंतर पुढे संबंधित अधिकाऱ्यांकडून घोटाळ्याची रक्कम वसूल केली जाणार का, तसेच त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल होणार का, याकडे शेतकरी आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.